_*" "*_
100 नंबर फिरवल्यावर येणारी पोलिस गाडी मेनरोड वर एका दोन मजली बंगल्यासमोर येऊन थांबली.
काॅंस्टेबल हरीश यांना फोन वर याच घराचा पत्ता दिला गेला होता. पण येथे तर चांगल्या घरांची वस्ती होती. येथे जेवण कुणी मागवले असणार? हाच विचार करत हरीश यांनी त्या नंबर वर काॅलबॅक केला.
"आत्ता दहा मिनिटांपुर्वी याच नंबर वरुन जेवण मिळावे म्हणून फोन आला होता. आपण जतीन बोलत आहात का?" आम्ही बंगला नंबर 112 च्या समोर उभे आहोत. येथून कुठे यायचं आहे?
दुसऱ्या बाजूने आवाज आला, "तुम्ही तेथेच थांबा, मी येतो."
एका मिनिटांनंतर 112 नंबरच्या बंगल्याचे गेट उघडले आणि पासष्ट वर्षांच्या जवळपास वय असलेली एक व्यक्ती बाहेर आली.
त्यांना बघताच हरीश यांना राग आला व म्हणाले, "तुम्हाला लाज नाही वाटत, असे फोन करून जेवण मागवायला? गरीबांच्या हक्काचे जेवण तुमच्या सारखे श्रीमंत खातील तर गरीबांपर्यंत अन्न कसे पोहोचेल? आमची एवढी मेहनत वाया गेली."
"साहेब ही लाजच होती जी आम्हाला येथपर्यंत घेऊन आली.
नोकरी लागताच लाज वाटून कर्ज घेऊन बंगला बनवला. अर्ध्यापेक्षा जास्त पगार हप्ता भरण्यात जात होता. आणि अर्धा मुलांच्या संगोपनासाठी खर्च होत होता.
आता निवृत्त झाल्यावर पेंशन मिळत नव्हती म्हणून बंगल्याचा काही भाग भाड्याने दिला. आता लाॅकडाउन मुळे भाडे ही मिळाले नाही.
मुलाला नोकरी लागली नाही म्हणून प्राॅव्हिडंट फंडाचे जे पैसे मिळाले होते त्यातून मुलाला व्यवसाय टाकून दिला आणि त्यातून तो जे कमावत होता ते व्यवसाय वाढविण्यासाठी त्यातच लावत होता. त्याने बचत करुन पैसे वाचवण्याचा कधी विचार ही केला नाही. आता एक महिन्यापासून व्यवसाय ही ठप्प झाला आहे.
आधी वर्षभराचे गहू, तांदूळ भरून ठेवत असू. पण सुनबाईला हे जुनी फॅशन वाटत असे म्हणून लाज वाटून धान्याच्या दोन्ही कोठ्या कबाडी वाल्याला दिल्या. आता माॅल मधून पिठाची दहा किलोची पॅक पिशवी आणि पाच किलो तांदूळ घेऊन येतात.
राशन कार्ड बनवले होते तर मुलांना रांगेत उभे राहून तेथून राशन आणायला लाज वाटते म्हणून तो ही उपाय खुंटला.
सुनेचे जन धन अकाउंट ही उघडून दिले होते, पण त्यात एकदा ही पैसे जमा झाले नाहीत की काढले गेले नाहीत आणि ते खातेही बंद झाले. त्यामुळे सरकार कडून आलेले पैसे ही काढू शकलो नाही.
कालपासून जेव्हा काहीच मार्ग सुचत नव्हता आणि सकाळी जेव्हा नातवाला भुकेने रडतांना बघितले आणि सर्व लाज-शरम बाजूला ठेवून 100 नंबर फिरवला
*या भिंतींनी आम्हाला श्रीमंत तर बनवलं साहेब, पण आतून पोकळ बनवून टाकले. मजूरी करु शकत नाही, आणि उत्पन्न इतके कधीच झाले नाहीं की बॅंकेत शिल्लक ठेऊ शकू व काही दिवस बसून काढू शकू. तुम्हीच सांगा मी काय करू शकतो. एवढे बोलून जतीनजींना हुंदका अनावर झाला.*
काय बोलावे ते हरीशला समजत नव्हते. ते शांतपणे गाडीपर्यंत गेले आणि जेवणाची पाकिटे काढू लागले. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या पत्नीने काल राशन व घरासाठी किराण्याचे सामान मागवले होते. काल पासून घरी जाऊ न शकल्याने ते गाडीच्या डिक्कीतच पडून होते. त्यांनी डिक्की उघडली, सामान काढले, आणि जेवणाच्या पाकिटांसह सर्व सामान जतिनच्या घराच्या गेट जवळ ठेवले व काही न बोलता गाडीत येऊन बसले.
गाड़ी पुन्हा कुण्या अशाच अभाग्या श्रीमंताचे घर शोधायला निघाली होती.
*ही आजच्या मध्यम वर्गाची खरी परिस्थिती आहे.*
No comments:
Post a Comment